आता एमपीएससीही वादाच्या भोव-यात
एमपीएससीवर उमटत आहे अनेक प्रश्नचिन्ह..!
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा (एमपीएससी) पेपर रविवारी दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार होता, तरी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची अंतिम वेळ 9:30 ठरविण्यात आली होती. अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेस मुकले, 5-10 मिनिटांचा उशीरही मारक ठरला. राज्यभरातील केंद्रांवर रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. मात्र, मेगाब्लॉकमुळे मुंबईत काही विद्यार्थ्यांना ‘रिपोर्टिंग टाइम’ पर्यंत पोहोचता न आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्यांना परीक्षेस मुकावे लागले. मेगाब्लॉक आणि अन्य काही अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. बरेच जण केवळ 5 ते 10 मिनिटे उशिरा पोहोचले होते. सिडनहॅम कॉलेज केंद्रावर 15 विद्यार्थ्यांसोबत असाच प्रकार घडला. तर औरंगाबादला 28 टक्के विद्यार्थ्यांनी दांडी मारली. पहिला पेपर गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कठीण होता. विज्ञान, इतिहास आणि भूगोल विषयाचे पेपर कठीण होते. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याचे संकेत मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सी-सॅटचा पेपर सोपा होता.
नागपुर शहरात रविवारी सकाळी 10 वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजला. नागपुर शहरातील साउथ अर्न पॉईंट स्कूल येथे एमपीएससी परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारानंतर केंद्रावर एकच गोंधळ उडाला व अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारण्यासाठी केंद्रापुढे आंदोलन केले. तर, एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा कुठलाही पेपर फुटला नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. हा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केल्या गेला. या परीक्षेच्या प्रश्नसंचाचा सील आधिच फोडण्यात आला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सकाळी 10 वाजताचा हा पेपर होता. दरम्यान, एका विद्यार्थ्याला पेपरसंचाचे सील उघडले असल्याचे दिसून आले. त्याने याबाबत आपल्या मित्राला माहिती दिली. त्यानंतर, पेपर पूर्ण झाला मात्र तोपर्यंत अभाविपचे कार्यकर्ते केंद्राबाहेर जमले व पेपर फुटल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे देखील केंद्रावर आले. त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारत आग्रही भूमिका घेतली. यानंतर, गोंधळ वाढला व पोलिसांनीही केंद्रावर पोहचत मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
एमपीएससीने 2020 मधील गट ब च्या पूर्व परीक्षेत प्रश्न चुकल्याने याचिका दाखल केलेल्या अवघ्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. इतर 3 हजार 500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थीही आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा येत्या 29 आणि 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा निकाल जाहीर करताना आयोगाकडून उत्तरतालिका तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरपत्रिकेवर काही विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. उत्तरपत्रिकेत अनेक प्रश्नाचे उत्तरे चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता.
याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे विद्यार्थी एका मार्कामुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार होती. 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आल्याने इतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तर, काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे आमदार कपिल पाटील यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातले आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आमदार कपिल पाटील यांनी थेट एमपीएससी आयोगाच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहिले आहे. एकामुळे सुमारे 3 हजार 500 विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या 86 विद्यार्थ्यांप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची मागणी केली आहे. कपिल पाटील यांनी काल रात्री पुण्यात येऊन एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली. एमपीएससीने 2020 मधील गट ब च्या पूर्व परीक्षेत प्रश्न चुकल्याने याचिका दाखल केलेल्या अवघ्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. इतर 3 हजार 500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
एमपीएससीने 86 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आदेश काढले आहेत. अराजपत्रित दुय्यम सेवा गट ब 2020 च्या मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एमपीएससीने आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांना 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या 86 विद्यार्थ्यांना 29 आणि 30 जानेवारीच्या परीक्षेला बसता येणार होते. केवळ न्यायालयात गेलेल्या 86 जणांना परीक्षा देता येणार होते. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक करीता मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार 86 विद्यार्थ्यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एमपीएससी 2020 च्या जाहीरातीमधील पीएसआय पदाच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचा फटका बसला आहे. त्या संदर्भात 86 विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला परवानगी देण्याची उच्च न्यायालयाने एमपीएससीला आदेश दिले. मात्र पूर्व परीक्षेचा निकालचं परत लावावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 86 विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही मुख्य परीक्षेला बसू द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार होते. 3 हजार 500 विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचा फटका बसला आहे. त्यामुळे निश्चितच सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसू देण्यात यावी. जर चुकीचा प्रश्न टाकलाच नसता, तर हा गोंधळ झालाच नसता. त्या अनुषंगाने 3 हजार 500 विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यायलाच पाहिजे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात सुरूवातीला 86 विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले हाेते. आता मुंबई उच्च न्यायालय 161, औरंगाबाद 88 आणि नागपूर खंडपीठाने 9 असे 258 विद्यार्थ्यांना आजच्या सुनावणीत पात्र ठरवले आहे. आता एकूण 344 विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरले आहेत. आयोगाच्या अन्यायाविरोधात युवासेना तसेच राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली.
केवळ 344 मुलांना विशेष न्याय देऊन संविधानातील समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते याची जाणीव असायला हवीच. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या याचिकेला प्रातिनिधिक स्वरूपाचे समजून आयोगाने सर्वांना न्याय देऊन संविधानाच्या समान संधी व न्यायाच्या तत्वाचे पालन करून या तरुणांना त्यांचे स्वप्न साकारण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव तसेच आयोगाच्या सचिवांकडे युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. कारण आधीच्या तीन उत्तरतालिकेत बरोबर प्रश्नाला चुकीचे आणि चुकीच्या प्रश्नांना बरोबर असा घोळ घातला आहे. त्यामुळे चौथी बरोबर उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामधूनच पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे असे पात्र विद्यार्थी सौरभ कोरडे (औरंगाबाद) याने सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कामाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामुळे पूर्ण निकाल बदलणार आहे. अन्यथा पात्र असूनही हजारोंना याचा फटका बसणार आहे. याचा आयोगाने विचार करावा असे पात्र विद्यार्थी हनुमंत हिरवे (मुंबई) म्हणाला आहे.
याचिका दाखल विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघता राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणा-या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. गट ब दर्जाच्या पदांसाठी मुख्य परीक्षा होणार होत्या. मात्र या मुख्य परीक्षेआधी झालेल्या पूर्व परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उत्तर पत्रिका तपासताना चूक झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. हा दावा करणाऱ्या 86 विद्यार्थ्यांकडून त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आयोगाने उत्तर पत्रिका तपासताना चूक केल्याने आपली मुख्य परीक्षा देण्याची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असा निर्णय दिला होता. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांनी त्यांनाही आयोगाच्या चुकीमुळे एक किंवा दोन कमी मिळाले आणि मुख्य परीक्षेची संधी हुकल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती.
पुण्यात एमपीएससी करणा-या विद्यार्थ्यांकडून त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र अचानकपणे मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास मर्यादित प्रमाणात असलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांमुळे परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं म्हणत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांची पुढची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479
stay connected