ठाण्याचा वाघ, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर चित्रपट....! प्रवीण तरडे करणार दिग्दर्शन.

 ठाण्याचा वाघ,

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या

जीवनावर चित्रपट....!

प्रवीण तरडे करणार दिग्दर्शन.





*आनंद दिघे यांच्यावर त्यांच्या हायातीमधे अनेकदा हल्ले झाले.मात्र सर्व हल्ल्यांमधून ते सुखरूप निसटायचे.त्यामुळे त्यांना पोलिसांचे मोठे संरक्षण होते.सर्व सामान्यांची मदत करताना दुखावलेले लोक अशा प्रकारे छुपे हल्ले करत होते.मात्र त्यांनी या हल्ल्याची कधी पर्वा केली नाही.ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.*


प्रतिनिधी : संजय पंडित

दि.३० ठाणे - धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तीक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे याचं व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. त्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे” या चित्रपटाकडे लाखो शिवसैनिक डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुरु झाली असून दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई हा चित्रपट साकारणार आहेत. आनंद दिघेंच्या स्वत:च्या गाडीचा चित्रपटात वापर होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देतानाच हा चित्रपट भव्य दिव्य तर होईलच पण धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य कदापि विसरता येणार नाही हे स्पष्ट केले.

तरूणांच्या गळ्यातील ताईत होते आनंद दिघे -सत्तर ऐंशी दशकातील तो काळात मराठी माणूस बाळासाहेबांच्या विचाराने भारावला होता. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे शब्द मराठी मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवत होते. अर्थात मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यावरही त्याचे ठळक परिणाम दिसायला लागले होते. याच परिणामांनी ठाणे शहरावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. सतीश प्रधान शिवसेनेचे आणि ठाणे शहराचे पाहिले महापौर झाले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बाळासाहेबांच्या विचारांचे वेड लागलेला, सर्वसामान्य घरातील सामान्य अंगकाठीचा एक तरुण झंझावात पुढे येत होता. त्याने त्याचे सम्पूर्ण आयुष्य शिवसेना आणि बाळासाहेब यांच्यासाठी झोकून द्यायचे ठरविले होते. आपल्या काम करण्याच्या विशिष्ट शैलीने तो अल्पकाळातच तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला. सर्वसामान्य शिवसैनिक, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी काहीवेळातच त्याने झेप घेतली. साक्षात शिवरायांची काम करण्याची दरबारी पध्दत त्याने अनुसरली आणि बघता बघता आनंद दिघे हे नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दुमदुमू लागले. दिघे यांची असलेली अध्यात्मिक बैठक आणि कट्टर हिंदुनिष्ठतेने त्यांना धर्मवीर ही पदवी आपसूकच चिकटली.

 -आनंद दिघे यांचा आनंद आश्रम नागरिकांसाठी अहोरात्र खुला होता. त्याची देखभाल करण्यासाठी अनेक लोक तैनात असायचे. याच ठिकाणी राज्यभरातील विविध भागातून लोक आपल्या अडचणी सोडवण्यासाठी येत असत. त्यांनी अनेक नेत्यांना कानफटवले देखील आहे. आज हयात असलेल्या अनेक नेत्यांना त्यांच्या विरोधात कानफटवले असल्याचेही आनंद आश्रमातील लोक सांगतात. मात्र त्यामागे अन्याय सहन करणार नाही, अन्याय करू देणार नाही हीच भावना असल्याचे ठाणेकर नागरिक सांगत आहेत. आनंद दिघे यांची मैत्री सर्वांशी होती आणि त्यामुळे ते अजातशत्रू होते. वसंत डावखरे हे सुरूवातीचे काँग्रेस आणि मग राष्ट्रवादीचे नेते होते. ते आनंद दिघे यांचे जिगरी दोस्त होते आणि त्यांची दोस्ती ही अनेकांनी अनुभवली आहे.


आनंद दिघे यांच्यावर त्यांच्या हयातीमध्ये अनेकदा हल्ले झाले. मात्र सर्व हल्ल्यांमधून ते सुखरूप निसटायचे. त्यामुळे त्यांना पोलिसांचे मोठे संरक्षण होते. सर्वसामान्यांची मदत करताना दुखावलेले लोक अशाप्रकारे छुपे हल्ले करत होते. मात्र त्यांनी या हल्ल्यांची कधी पर्वा केली नाही. आनंद दिघे यांच्या गाडीच्या अपघातानंतर त्यांना रेमंडच्या मालकीच्या सिंघानिया रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांनी रेमंड कंपनीची आणि सिंघानिया रुग्णालयाची तोडफोड केली. त्यानंतर जाळपोळ झाल्याने ते रुग्णालय तेव्हापासून बंद झाले. त्यानंतर 3 दिवस ठाण्यात कर्फ्यु लावण्यात आला होता. त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी देशभरातुन लाखो लोक आले होते.


मंगेश देसाई निर्मिती करीत असलेल्या या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी ठाण्यात या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रवीण यांनी मुंबईच्या बीचवरील फोटो शेअर करत या प्रकल्पाची अस्पष्ट माहिती दिली होती. परंतु आता थेट सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत त्यांनी आनंद दिघे यांच्या जीवनपटाची अधिकृत घोषणा केली.


चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण करणार आहेत. तर साहिल मोशन आर्ट्स या चित्रपटाची निर्मिंती करणार आहे. मंगेश देसाईंनी सिनेमाची निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. चित्रपटाची कथा प्रवीण यांचीच आहे. आतापर्यंत प्रविण यांनी मुळशी पॅटर्न, देऊळबंद आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते असे हिट चित्रपट केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.