JALNA| सकल मराठा समाजाकडून निदर्शने करत जालना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
- अवघ्या राज्यसह देशाचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात व सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे ८ जून २०२४ पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे, त्यांच्या उपोषणाला आजचा ५ वा दिवस आहे , मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची तब्येत खराब होत चालली आहे, तरी पण या राज्यसरकारला त्यांच्याशी काही देणंघणं नाही व मराठा समाजाशी देखील काही देणं घेणं नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा सरकारच्या विरोधात आपले रणसिंग फुंकताना दिसून येत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत सकल मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ८ जून पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहे. त्यांची मागणी आहे की सग्या सोयऱ्याची जो अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची अंमलबजावणी करून सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा व मराठा समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी या निवेदनात सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे याप्रसंगी जालना शहरासह जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते. याप्रसंगी 'एक मराठा लाख मराठा' च्या जोरदार घोषणाबाजी करत व जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी मराठा समाज बांधवांनी दणाणून सोडला होता. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
stay connected