आष्टी तालुक्यातील क्रीडांगण, नाट्यग्रह, बसस्थानक, पाणी प्रश्न, रोजगार आदी प्रश्न कधी सुटणार Ashti Beed News

 आष्टी तालुक्यातील क्रीडांगण, नाट्यग्रह, बसस्थानक, पाणी प्रश्न, रोजगार आदी प्रश्न कधी सुटणार



आष्टी (ता ९) प्रतिनिधी - तालुक्यातील मांडवा येथील रहिवाशी असलेले ऑलिंपिक वीर अविनाश साबळे यांनी देशासाठी अनेक पदके मिळवून संपूर्ण जगात देशाची मान उंचावली आहे. अविनाश साबळे या खेळाडू सोबतच आष्टी तालुक्याने मोठ्या प्रमाणावर खेळाडू घडविले आहे परंतु खेळाडूंसाठी आष्टी तालुक्यामध्ये क्रीडांगण नाही ही शोकांतिका आहे. खेळाडूंसाठी क्रीडांगण कधी होणार असे प्रश्न खेळाडू मधून विचारला जात आहे. खेळाडूंसाठी तालुक्यात मोठे क्रीडांगण व्हावे अशी अपेक्षा आष्टी चे आमदार सुरेश धस यांच्याकडून व्यक्त होत आहे. तसेच आष्टी तालुक्यात सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा सारखे अनेक कलाकार आहेत, आष्टी तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून येथे नागरिकांच्या करमणुकीसाठी नाट्यगृहाची आवश्यकता आहे. आष्टी किंवा कडा येथे प्रेक्षकांसाठी नाट्यगृह बांधण्यात यावे अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून आष्टी तालुक्याचे नाव घेतले जाते पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या अनेक बसेस हे आष्टी मार्गे आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या भागात मोठ्या प्रमाणावर जातात. परंतु कडा व आष्टी येथे बस स्थानक मंजूर असून आष्टी येथील बस स्थानकाचे काम मागील चार ते पाच वर्षापासून सुरू आहे ते पूर्ण झालेले नाही तर कडा येथील बस स्थानक च्या नवीन इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. आष्टी बस स्थानकामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. एक तात्पुरत्या स्वरूपात शौचालय आहे परंतु तेथील साफसफाई नसल्याने व पाणी नसल्याने प्रवाशांना उघड्यावरच लघु शंका करावी लागते. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच वराहाचा वावर दिसून येत आहे. बस स्थानक परिसरामध्ये अनेक खड्डे आहेत थोडासाही पाऊस झाला त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून बस स्थानक परिसरात दल दल तयार होते याचा नाहक त्रास सर्व सामान्य प्रवाशांना होताना दिसून येतो.त्यामुळे बस स्थानकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशातून व्यक्त होत आहे. आष्टी तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी शासनाकडून तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला असतानाही येथील पाणी प्रश्न पूर्णतः सुटलेला नाही. अनेक योजना ह्या कागदोपत्री गुंडाळल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आष्टी तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागते. येथील पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावावा यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. आष्टी तालुक्यामध्ये एमआयडीसी नसल्यामुळे तसेच रोजगाराचा प्रश्न सुटावा असा एकही मोठा प्रकल्प नाही त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. येथील तरुण रोजगारासाठी पुणे मुंबई व राज्यातील विविध भागात स्थलांतरित होत आहे. येथील तरुणांना आष्टीत रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसीचा प्रश्न मतदारसंघामध्ये मार्गी कधी लागणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. यासह आष्टी तालुक्यातील रस्ते, वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे तसेच शहरासह तालुक्यातील कडा धामणगाव धानोरा पिंपळा दौलावडगाव खडकत आदी मुख्य गावांमध्ये सर्वसामान्यांसाठी शौचालयाचे प्रश्न आमदार सुरेश धस यांनी सोडवणे गरजेचे आहे अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.



आष्टी हे तालुक्याचे शहर आहे परंतु या शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होऊन ही मंजूर असलेलं तालुका क्रीडा संकुलन होत नाही. तसेच या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत परंतु शहरांमध्ये नाट्यगृह नाही. नाट्यगृह होणे गरजेचे आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही त्यासाठी तालुक्यात एमआयडीसी होणे अपेक्षित आहे. जेणे करून येथील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल.  शहरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी नाना- नानी पार्क होणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबी नवीन आमदार सुरेश धस यांच्याकडून अपेक्षित आहे.



अविशांत कुमकर 
(राष्ट्रीय खेळाडू खो खो)


आष्टी बस स्थानकाचे काम मागील सहा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे ते पूर्ण करणे तसेच तेथे प्रवाशांसाठी एकच शौचालय आहे त्यामध्येही पाणी नसते व बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आहे. आष्टी आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडावे, तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था आहे. काही शिक्षक शाळेवर वेळेवर येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आष्टी ते साबलखेड रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या मार्गाने जाणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे याने खेळामध्ये देशाचे नाव लौकीक केले तरी ही खेळाडूंसाठी येथे क्रीडांगण नाही. वरील सर्व प्रश्न नवीन आमदाराने सोडवावेत अशी माझी अपेक्षा आहे.



- गणी तांबोळी
 (सामाजिक कार्यकर्ते,आष्टी)




आष्टी शहराची व्यापार पेठ दिवसेंदिवस वाढत आहे. आष्टी नगरपंचायत मार्फत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. परंतु येथे अपुरी पार्किंग सुविधा आहे. तसेच रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टीवर  उपाय योजना होणे नवीन आमदारकडून अपेक्षित आहे. शहरात एक ही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे बाहेरील गावातून कामानिमित्त आष्टी शहरात आलेल्या महिला व पुरुषांना उघड्यावर लघुशंका कराव्या लागतात. त्यामुळे वरील प्रश्न नवीन आमदाराने सोडावी ही अपेक्षा आहे.   



मुजाहिद सय्यद, युवक

आष्टी तालुक्यामध्ये अनेक गावात पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये जाणवतो. पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या गेल्या परंतु पाणी टंचाई चा प्रश्न सोडवता आला नाही. आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदाराने आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर केलेली नाही. त्यामुळे माझी अपेक्षा आहे नवीन आमदाराने आष्टी तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी प्रयत्न करावेत. 



- विवेक महाजन (ग्रामस्थ, दादेगाव)





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.